वाढत्या उन्हाच्या प्रकोपामुळे ‘महाराष्ट्र केसरी’चे सकाळच्या सत्रातील सामने पुढे ढकलले


सातारा – गेले दोन वर्ष जणू काही सारे विश्वच कोरोनामुळे थांबले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेलाही याचा फटका बसला होता. आता ही स्पर्धा तब्बल दोन वर्षांनंतर होत आहे. पण या स्पर्धेत यंदा कोरोना नाहीतर वाढते तापमान अडसर ठरले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सकाळच्या सत्रातील सामने साताऱ्यातील वाढत्या तापमानामुळे पुढे ढकलण्यात आले आहेत. हे सर्व सामने संध्याकाळी पाचनंतर घेतले जाणार आहेत.

यंदा साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. साताऱ्यात या स्पर्धेचे येत्या 4 ते 9 एप्रिलदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. अशातच या स्पर्धेच्या यंदा आयोजनामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातील पैलवानांमध्ये उत्साह दिसून येत आहे.