महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर


कोल्हापूर – आज मोठा निर्णय घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला झटका दिला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली आहे. कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले, महाविकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली आहे. कोल्हापूरमध्ये याबाबतची घोषणा राजू शेट्टी यांनी केल्यामुळे आता आम्ही स्वतंत्र आहोत.

दरम्यान, याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी (१ एप्रिल) सूचक इशारा दिला होता.

त्यावेळी राजू शेट्टी म्हणाले होते, आघाडी सरकारचा सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करताना सूचक म्हणून माझे नाव घेतले होते. कारण त्यांना स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जपलेले नैतिक अधिष्ठान हवे होते. स्वाभिमानीने पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते.

अडीच वर्ष आघाडी सरकारला होत आली, तरी ज्या किमान समान कार्यक्रमावर आघाडी अस्तित्वात आली, त्याचे पुढे काहीच झाले नाही. नवीन धोरण राबवत असताना मित्रपक्षांना विचारले जात नाही. आघाडी सरकारचे समीक्षण करण्याची आता वेळ आल्याचे शेट्टी म्हणाले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळले आहेत. याबाबत भाजपची कोणती भूमिका राहील? या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे स्वागतच केले जाईल, असे उत्तर दिले. तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता.