महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजीच्या चर्चांबद्दल संजय राऊतांचे मोठे वक्तव्य


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचा भाजपने जणू प्रणच घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरच पडणार, असे भाजपकडून सातत्याने सांगितले जात आहे. त्याचदरम्यान महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्याही चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी या चर्चांवर भाष्य केले असले, तरी काही ना काही कारणाने या चर्चा उफाळून वर येत आहेत. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शिवसंवाद दौऱ्यासाठी काही खासदार गेले होते, चार चार दिवस जिल्ह्यात राहिले. संघटनात्मक बांधणीबद्दल अहवाल बनवले. आता अधिवेशन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सगळ्यांची बैठक होईल. महाविकास आघाडीतील मंत्र्यांबद्दल तक्रारी येत आहेत, पण त्या तक्रारींमध्ये तथ्य़ नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावे लागेल. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला हे सरकार आपले आहे असे वाटावे. सरकारमधील प्रत्येक मंत्र्याचे हे कर्तव्य आहे की पक्ष न पाहता त्यांनी प्रत्येकाचे ऐकून घेतले पाहिजे. नाराजी असणे हे सामान्य आहे. त्यासाठी एकत्र बसून सूचना द्यावा लागतील. आपण जर पालकमंत्री असू, तर खाली शिवसेना आहे, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष दिले पाहिजे. सर्वच पालकमंत्र्यांसाठी हा इशारा आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा किंवा मंत्रिमंडळात काही खांदेपालट करायचा हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. तीन पक्ष मिळून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतील. त्यावर मी दिल्लीत बसून बोलणे योग्य नाही. नक्कीच काँग्रेसचे आमदार आलेले आहेत. ते काल वेणुगोपालना भेटले. माझीही त्यांच्याशी चर्चा झाली. प्रत्येकजण आपल्या हायकमांडला भेटायला येत असतो. आता शिवसेना सोडली, तर प्रत्येकाचे हायकमांड दिल्लीतच आहेत. संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही संघर्ष करत नाही. त्यांना खाजवायची सवय आहे. आता त्यांची खाज कधी संपेल माहित नाही. पण एवढी पण खाज बरी नाही.

सध्या राज्यात अजानच्या भोंग्यांबद्दल चाललेल्या चर्चांबद्दल संजय राऊत म्हणतात, राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपशासित राज्यांचे प्रमाणही जास्त आहे. गोव्यात मी होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातील भोंगे तसेच आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचे पालन व्हायला हवे.

दरम्यान संजय राऊत भाजप आणि ईडी कारवाईसंदर्भात भाष्य करताना म्हणाले, महाराष्ट्रात पैसे जपून खर्च करा. जरी तुम्ही भाजी खरेदी केली, तरी तुमच्यावर भाजपचे लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेला, तरी तुम्ही किती किलो चिकन घेतले, काल किती घेतले, आज किती घेतले यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवे.