संजय राऊतांविरोधात ईडीने केलेल्या कारवाईनंतर निलेश राणे म्हणतात…


मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीकडून संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. आता भाजपच्या नेत्यांनी या कारवाईनंतर राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाच संजय राऊतांवर आता माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची ही संपत्ती आहे कशावरुन, असा प्रश्न उपस्थित करत हा संजय राऊत यांनी कमवलेला काळा पैसा बाहेर आल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने यासंदर्भात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

निलेश राणेंनी संजय राऊतांवर झालेल्या कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया देताना, जी काही संपत्ती ईडीकडून अटॅच करण्यात आली आहे. ती संपत्ती आहे हे कशावरुन? हा काळा पैसा आहे, असे मी समजतो. जे काय सापडले आहे ते ईडीलाच माहिती. पण आज ना उद्या हे संजय राऊतांसोबत होणारच होते. कारण एवढा कोंबलेला पैसा हा कधी ना कधी बाहेर येणारच होता, असे म्हटले आहे.

आता राऊतांचे स्पष्टता देण्याचे काम आहे. कुठून आला हा पैसा? फक्त सामनाचा पगार घेऊन? जे काही हे गाड्या फिरवतात, ज्या घरात राहतात हे सगळे त्या पगारातून आले आहे का? हे दाखवण्याची वेळ आता आली आहे. आता राऊत काय बोलतात त्याला महत्व नाही. मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत हा पैसा कुठून आला याचा पुरावा आता राऊतांना द्यावा लागेल, असेही निलेश राणे म्हणाले आहेत.

मागच्या वेळेला संजय राऊत यांनी आयकरमधून पैसे चोरलेले. अशी ढापाढापी करत असतात ते. काळ्या पैशाची जमावजमव करत असतात. या काळ्या पैशाची जमवाजमव करता करता ते आज येथपर्यंत आले आणि ईडीने त्यांना पकडले. हे आज ना उद्या होणारच होते, असा खोचक टोला निलेश यांनी लगावला आहे.

संजय राऊत जे ईडीने कारवाई केल्यानंतर तडफडत आहेत किंवा जे काही बोलत असतील, ते मी ऐकलेले नाही. पण झाले ते योग्य झाले. हे होणारच होते. संजय राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही कारवाई होऊ शकते. त्यांनीही काळा पैसा जमा केला असेल. आज ना उद्या बाहेर पडणार ते सगळे, असेही निलेश राणेंनी म्हटले आहे.

राऊत आकसापोटी केलेली कारवाई आहे असे म्हणत असल्याचे संदर्भ देत पत्रकाराने प्रश्न विचारला असता निलेश राणेंनी, ही त्यांची फार जुनी टेप आहे. ते स्वत:ला फार महत्व देतात. आम्ही त्यांना एवढे महत्व कधीच दिलेले नाही. जर काळापैसा कोणी जमवला असेल. मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत तपास यंत्रणेला काही धागेदोरे मिळाले असतील, तर त्याआधारे ते तिथपर्यंत पोहचले, असे म्हटले आहे.