रावसाहेब दानवेंनी युतीसाठी राज ठाकरेंची ‘ही’ भूमिका बदलण्याची केली मागणी


नवी दिल्ली – गुढीपाडवा सभेतील राज ठाकरेंचे भाषण आणि नितीन गडकरींनी दिलेली राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दिलेली भेट, यानंतर मनसे आणि भाजपची युती होईल, अशी चर्चा सुरू आहे. विविध राजकीय प्रतिक्रिया यावरून उमटत आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या युतींच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

जोपर्यंत परप्रांतीयांच्या धोरणात राज ठाकरे बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नसल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. आधी केवळ आम्हालाच वाटत होते की शिवसेनेने हिंदुत्व सोडले, पण राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणाचा अंदाज घेतला, तर आता घरातूनच आवाज उठायला लागला आहे. हिंदुत्वाच्या दिशेने राज ठाकरे चालले आहेत. लवकरच माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. पण ती वेगळ्या विषयावर होणार असून ही भेट राजकीय असणार नसल्याचे रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, रावसाहेब दानवेंनी राज्यातील मंत्र्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत. त्या तक्रार आल्यावरच कारवाई करतात. त्यामुळे तक्रार असेल, तर कोणावरही कारवाई होऊ शकते, त्यात घाबरण्याचे कारण काय? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला. तर, जोपर्यंत परप्रांतियांबाबतची भूमिका राज ठाकरे बदलणार नाहीत, तोपर्यंत भाजप मनसेची युती होणार नसल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.