मनसेचे दिलीप वळसे-पाटलांना मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान


मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपने लावून धरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. राज ठाकरे यांनी त्यावेळी मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, असे म्हटले होते. यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा देत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सूचक वक्तव्य केले. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच इशाऱ्यावर उत्तर दिले असून थेट गृहमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे, असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना विचारण्यात आले असता गृहमंत्र्यांच्या या इशाऱ्यावरुन देशपांडे यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिला आहे. कायदा कसा राबवायचा हे गृहमंत्र्यांनी शिकले पाहिजे. माझी सन्माननिय दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की, जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे पहिले पालन करा, असे देशपांडे म्हणाले. तसेच पुढे बोलताना देशपांडे यांनी, न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे पालन आधी करा, मग आम्हाला धमक्या द्या. आम्ही आहोतच, आम्ही कुठे जाणार आहोत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नसल्याचेही देशपांडे म्हणाले. तसेच पुढे बोलताना, असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले आहेत. त्यांचा आम्हाला फरक पडत नाही. जी मागणी आमची आहे ती कायद्याचे राज्य यावे, कायद्याचे पालन व्हावे. त्याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे, असे देशपांडे यांनी सांगितले.

आम्हाला दम देण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी कायद्याचे पालन करावे. सन्माननिय उच्च न्यायालयाने काय भूमिका घेतली आहे की, भोंगे उतरले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कारवाईला कोण महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही. आम्हाला काय फरक पडत नाही, त्या कारवाईचा. मूळात विषय असा आहे की आम्ही सांगत आहोत, कायद्याचे पालन करायचे, ते पहिले गृहमंत्र्यांनी करावे आणि मग आम्हाला दम द्यावा, असे देशपांडे यांनी पक्षाची भूमिका मांडताना म्हटले आहे.