राज ठाकरेंना ‘सरडा’ म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांना भाजपने सुनावले


मुंबई – गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळावात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची शरद पवारांनी स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोप केला. शरद पवारांवर राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका केली जात असून ‘रंग बदलणारा सरडा’ असे म्हटले जात आहे. यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंचा उल्लेख न करता यावरुन राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले आहे.

केशव उपाध्ये यांनी रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे, पण शरद पवार याचे काय? राजकीय किरकिर्दीत कितीवेळा पवारांनी रंग बदलले आहेत? अशी विचारणा केली आहे. शरद पवारांच्या राजकीय जीवनातील प्रवासातील काही घडामोडींचा यावेळी त्यांनी ट्विट करत उल्लेख केला आहे.


रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण @PawarSpeaks यांच काय? ? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली, असे केशव उपाध्ये म्हणाले आहेत.


२०१४ मध्ये भाजप सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले, याची आठवण केशव उपाध्ये यांनी करुन दिली. तसेच अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख केला. बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपसोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचे सरकार बनवले. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे.

दरम्यान राज ठाकरेंवर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रंग बदलणारा सरडा असा उल्लेख केला होता. सरडाही जितक्या वेगाने रंग बदलत नाही, तितक्या वेगाने राज ठाकरे रंग बदलत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते.