रोहित शर्माकडेच येणार टीम इंडियाची कप्तानी

विराट कोहली याने टीम इंडियाच्या कप्तानीचा अचानक राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआय त्या जागी कुणाची निवड करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमीना लागली होती. बीसीसीआयचा कप्तान शोध संपला असून विराटच्या जागी रोहित शर्मा याच्या हाती टीम इंडियाची धुरा सोपविली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र रोहितच्या नावाची अधिकृत घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल असे समजते.

विराटने सर्व फॉर्मेटची कप्तानी सोडली आहे. वन डे आणि टी २० साठी रोहित शर्मा कप्तान निवडला गेला आहेच. बीसीसीआयने यापूर्वीच विविध फॉर्मेटसाठी वेगवेगळे कप्तान निवडले जाणार नाहीत असे स्पष्ट केले होते. त्यामुळे टी २०, वन डेची कप्तानी असलेल्या रोहितचीच टेस्ट कप्तान म्हणून निवड होणे संयुक्तिक मानले जात आहे.

इनसाईडस्पोर्ट्स डॉट इन च्या बातमीनुसार बीसीसीआय निवड समिती, कोच आणि खेळाडू सर्वांनाच रोहित शर्मा यांच्याकडे कप्तानी द्यावी असे वाटते आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम निवड केली जाणार असून त्यासंदर्भात पुढच्या आठवड्यात बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होत आहे. त्याचवेळी रोहितच्या नावाची घोषणा केली जाईल असे समजते. २४ फेब्रुवारी पासून श्रीलंकेचा भारत दौरा सुरु होत आहे. त्यात ३ टी २० आणि दोन कसोटी खेळल्या जाणार आहेत.