भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार या भ्रमात राहुल गांधी; प्रशांत किशोर


पणजी – भारतीय राजकारणावर पुढील अनेक दशके भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक असल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. गोव्याच्या दौऱ्यावर असताना प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील अनेक दशके त्यांना भाजपशी लढावे लागणार आहे. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रशांत किशोर काम करत आहेत.

तृणमूलने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर किशोर यांनी ममता बॅनर्जींसोबत काम करत नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या, पण चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा तृणमूलसोबत काम करत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी गोव्यात पोहोचले आहेत.

प्रशांत किशोर यांनी अनेक दशके भाजपच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात राहुल गांधी आहेत.

प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया गोव्यात म्युझियममधील एका कार्यक्रमादरम्यान दिली आहे. भाजप जिंकेल किंवा हरेल, पण काँग्रेसच्या ४० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. भाजप कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात ३० टक्के मते मिळाली की तुम्ही एवढ्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

हीच अडचण राहुल गांधींची आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की फक्त थोड्या वेळेची ही बाब आहे, लोक जोपर्यंत मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत तोपर्यंत. ते होणार नाही. तुम्ही जोपर्यंत मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की मोदी एवढे लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहित असेल तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असे प्रशांत किशोर म्हणाले.

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे तुम्ही जा, ते तुम्हाला सांगतील ही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, याचे उदाहरणही प्रशांत किशोर यांनी दिले.