फडणवीस नव्हे, तर नवाब मलिक आणि आव्हाडांनी उघड केली संवेदनशील माहिती; रश्मी शुक्लांचा दावा


मुंबई – मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी तो रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. रश्मी शुक्ला यांनी त्याआधी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगप्रकरणी आरोपी बनवण्यात आले नसले, तरी त्यांच्याविरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस नव्हे, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये संवेदनशील माहिती उघड केली होती, असा दावा केला आहे.

याची दखल सर्वोच्च न्यायालयानेही घेतली होती. त्यामुळे राज्यानेच अवमान केला आहे. आपल्याकडे कुठलीच कागदपत्रे नसल्याचेही रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात म्हटले आहे. काही फोन नंबरवर होणारे संभाषण टॅप करण्याची मंजुरी महाराष्ट्र सरकारने दिली होती, असे रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात सांगितले होते. पोलीस दलातील बदल्या आणि पोस्टिंगच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या तक्रारी तपासण्यासाठी ही परवानगी दिली होती, असे शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयात सांगितले.

गुप्तवार्ता विभागाचे रश्मी शुक्ला नेतृत्व करत होत्या. महाराष्ट्राच्या डीजीपींनी त्यावेळेस काही नंबरवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. ते नंबर राजकीय नेत्यांशी निगडीत मध्यस्थींचे होते. इच्छित स्थळी पोस्टिंग आणि बदलीसाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम मागितली जात होती, असे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयासमोर सांगितले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना सचिव सीताराम कुंटे यांनी सादर केलेल्या अहवालावर विरोधकांनी टीका केली होती. सीताराम कुंटेंनी हा अहवाल तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी यावर फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. अशी शंका घेणे हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.