केंद्र सरकारची इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच – उद्धव ठाकरे


मुंबई – एमएमआरडीएने म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी मुंबई आणि परिसरातील म्हणजेच मुंबई महानगर भागातील भविष्यातील वाहतुकीच्या आराखड्याबाबत एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुंबई महानगर भागातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे घटलेले प्रमाण यावर यानिमित्ताने चिंता व्यक्त करण्यात आली. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून हे प्रमाण वाढवण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था भक्कम करण्याकडे पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या इंधन दरवाढीबाबत मिश्किल भाषेत केंद्र सरकारवर टीका केली. सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच ही इंधन दरवाढ केल्याचा टोला यावेळी मुख्यमंत्री यांनी लगावला. वाहतुक कोंडीत गाडी चालवायची कोणालाही आवड नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये प्रवाशांचा टक्का घसरत आहे, हे केंद्र सरकाराच्याही लक्षात आले आहे, म्हणून इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे, हे आपल्या भल्यासाठी होत आहे. तुम्हाला वाटते की मी टीकात्मक बोलतो आहे, पण तुम्ही सांगा, परवडले नाही की लोके सार्वजनिक वाहतुकीकडे वळतील, इंधन दरवाढ चांगल्या हेतुने होत आहे हे आपण लक्षातच घेत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान मुंबई महानगर आणि राज्यात चांगले रस्ते असण्याची आवश्यकता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. यामुळे राज्यात विकास वेगाने होईल, अशी आशा व्यक्त केली. तसेच मुंबई महानगरमधील वाहनांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. एमएमआरडीएच्या या कार्यशाळेत मुंबई महानगरमधील भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीबाबत चर्चा होत दिशा निश्चित केली जाणार आहे.