भारतीय सिनेसृष्टीत विकले जाते सर्वाधिक ड्रग्ज : रामदास आठवले


नवी दिल्ली – भारतीय सिनेसृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात आणि तातडीने भारतीय चित्रपट सृष्टीला स्वच्छ करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी सांगितले. आठवले पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असून त्यात बदल घडवून आणण्याची गरज आहे. तसेच अमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात यावे आणि त्यांना अटक करण्यात येऊ नये किंवा तुरुंगात टाकू नये, असेही मंत्री म्हणाले.

जे दारू पितात किंवा सिगारेट ओढतात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही, परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण कितीही असले तरी त्यांना तुरुंगात टाकले जाते. हे बदलण्याची गरज आहे आणि जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्ज वापरतात त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले पाहिजे, त्यामुळे ते सुधारतील असा आमच्या मंत्रालयाचा विश्वास असल्याचेही आठवले म्हणाले.

दरम्यान, सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले.