मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीनासाठी माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार बाजू!


मुंबई – अद्यापही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळत नसल्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. आर्यन खानचा जामीन अर्ज एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता जामिनासाठी आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शाहरुख खान मात्र आपल्या मुलाला सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आर्यन खानसाठी पुन्हा एकदा नव्याने वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांच्यानंतर आता आर्यन खानची बाजू मुंबई उच्च न्यायालयात थेट भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू केंद्र सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अर्थात एजीआय मुकुल रोहतगी मांडणार आहेत. उच्च न्यायालयात आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये त्याची ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम केली होती. त्यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला होता.

दरम्यान, न्यायालये येत्या १ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहेत. न्यायालय पुढचे दोन आठवडे बंद राहणार असल्यामुळे या तीन दिवसांत आर्यन खानला जामीन न मिळाल्यास त्याचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम थेट १५ नोव्हेंबरपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आता मुकुल रोहतगी यांच्याकडे आर्यन खानचे वकीलपत्र सोपवण्यात आले आहे. २९ ऑक्टोबरला न्यायालयाचे कामकाज सुरु राहणार आहे. पण त्यानंतर ३० आणि ३१ ऑक्टोबरला शनिवार आणि रविवार असल्याने कोर्ट बंद असेल.

तर दिवाळीच्या सुट्टीनिमित्ताने १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या काळात न्यायाधीश हजर नसतील. त्यामुळे आजच्या सुनावणीत किंवा येत्या ३ दिवसात आर्यनच्या जामीन अर्जाचा निकाल जाहीर न झाल्यास आर्यन खानला कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी घरी जाता येणार नाही. १५ नोव्हेंबरपर्यंत त्याला जेलमध्येच रहावे लागेल.