पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींवर कौतुकाचा वर्षाव


वाराणसी – आज सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून ते गोरखपूर विमानतळावरून सिद्धार्थनगरला पोहोचले. पंतप्रधानांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी यावेळी २,३२९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन असे म्हटले आहे.

आता काही महिने अजून हा उत्साह टिकवून ठेवायचा आहे. पूर्वांचलसाठी, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आजचा दिवस आरोग्याच्या डबल डोसची भेट घेऊन आला आहे. नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे सिद्धार्थ नगर येथे उद्घाटन झाले आहे. उत्तर प्रदेशातूनच देशासाठी मोठी आरोग्य योजना सुरु होत आहे. या मोठ्या कामासाठी मी तुमचा आशिर्वाद घेऊन काशीला जाणार आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेशात आज भाजप सरकार हे अनेक कर्मयोगींच्या अनेक दशकांच्या तपश्चर्येचे फळ आहे. स्वर्गीय माधव प्रसाद त्रिपाठी यांच्या रूपाने एक समर्पित लोकप्रतिनिधीही सिद्धार्थनगरने दिला, ज्यांच्या अथक परिश्रमाचा आज राष्ट्रासाठी उपयोग होत आहे. सिद्धार्थनगरच्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव माधव प्रसाद त्रिपाठी नावावर ठेवणे ही त्यांच्या सेवेला खरी श्रद्धांजली आहे. मी यासाठी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या संपूर्ण सरकारचे अभिनंदन करतो. माधव प्रसाद त्रिपाठी यांचे नावही येथून पुढे येणा-या तरुण डॉक्टरांना जनसेवेसाठी सतत प्रेरणा देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

सुमारे अडीच हजार नवीन खाटांची निर्मिती नऊ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीमुळे झाली आहे. पाच हजारांहून अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. यासोबतच दरवर्षी शेकडो तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा नवा मार्ग खुला झाला आहे. उत्तर प्रदेश आणि पूर्वांचलला श्रद्धा, अध्यात्म आणि सामाजिक जीवनाशी संबंधित एक मोठा वारसा आहे. हा वारसा निरोगी, सक्षम आणि समृद्ध उत्तर प्रदेशच्या भविष्याशी देखील जोडला जात आहे, असे मोदी म्हणाले. मागील सरकारने ज्या पूर्वांचलची प्रतिमा खराब केली होती, पूर्वांचल जे एन्सेफलायटीसमुळे झालेल्या दुःखद मृत्यूमुळे बदनाम झाले होते, तेच पूर्वांचल, तेच उत्तर प्रदेश भारताला आरोग्य सुविधा देणार असल्याचेही मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की योगीनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. योगीजी तेव्हा मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आज लोक पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे पंतप्रधान म्हणाले. सरकार जेव्हा संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते, तेव्हा हे असे काम होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का? हे पूर्वी का झाले नाही आणि आता का होत आहे, याचे एकच कारण आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य असल्याचे मोदी म्हणाले.

दिल्लीत सात वर्षांपूर्वी सरकार होते आणि उत्तर प्रदेशमध्ये चार वर्षांपूर्वी सरकार होते, पूर्वांचलमध्ये त्यांनी काय केले? जे आधी सरकारमध्ये होते, ते कुठेतरी दवाखाना, कुठेतरी छोटेसे हॉस्पिटल जाहीर करून मतांसाठी बसायचे. वर्षानुवर्षे, एकही इमारत बांधली गेली नाही. जर इमारत होती, तेथे मशीन्स नव्हत्या, जर दोन्ही केले तर डॉक्टर आणि इतर कर्मचारी नव्हते. गरिबांचे हजारो कोटी रुपये लुटणारे भ्रष्टाचाराची सायकल चोवीस तास चालायची, असे मोदी म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू असल्याचे मोदी म्हणाले.