मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडिया अजून एक मोठा धक्का, प्रमुख खेळाडू जायबंदी


टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानने रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला पराभूत न करु शकणाऱ्या पाकिस्तानने विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आणि टीम इंडियाला मोठा झटका दिला. दरम्यान भारतीय संघाची चिंता वाढवणारी अजून एक माहिती समोर आली आहे.

उजव्या हातावर चेंडू लागल्यामुळे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. हार्दिकच्या हातावर पाकिस्तानविरोधातील सामन्यादरम्यान चेंडू लागला होता. या सामन्यात हार्दिक आठ चेंडूंवर फक्त ११ धावा करु शकला. हातावर चेंडू लागल्यामुळे जायबंदी झालेली हार्दिक पांड्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे विराट कोहलीची चिंता वाढली आहे.