समीर वानखेंडेंनी आरोपांचे खंडन केल्यानंतर संजय राऊत म्हणतात…


मुंबई – कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी मोठे खुलासे केल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी त्यानंतर प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. पण चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नसल्याचा निशाणा संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर साधला आहे.

एक चित्र सुशातसिंह राजपूत प्रकरणापासून निर्माण केले असून, फक्त गांजा, अफू, चरस याचेंच पीक महाराष्ट्रात निघते. महाराष्ट्राचे मुंबईची सिनेसृष्टी ही वैभव आहे. त्याला महाराष्ट्रातील काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत, हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?, असे संजय राऊत यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

संजय राऊत याविषयी बोलताना भाजपच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी, असे माझे म्हणणे आहे. याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका विशेष पथकाची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणे आमच्या गळ्यात मारले आहे, ते काढले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

ड्रग्जविरोधात महाराष्ट्र पोलिसांचे खाते काम करत आहे. केंद्राने त्यासाठी येथे येऊन काम करण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत असल्याचे दाखवायचे. मुंबईतील सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे, यासाठी हे धंदे सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या असतात राजकीय पक्षाच्या नसतात. भाजपचे लोक केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नोकर आहेत, अशा तऱ्हेने कारभार करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान एनसीबीने आरोप फेटाळून लावले आहेत, असे म्हटल्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपशी संबधित पंच आहेत. त्यातील एकानेच पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती दिल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.