पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याचा प्रयत्न व्हावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे


मुंबई : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे आवश्यक बनले आहे. यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहेच नागरिकांनीही यात योगदान द्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यादृष्टीने कलानगर परिसरातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी नगरसेविका रोहिणी कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महापालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे, सहायक आयुक्त अल्का ससाणे आदी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने ॲडव्हान्स लोकँलिटी मॅनेजमेंट समिती स्थापन करावी. याद्वारे घनकचरा व्यवस्थापन करणे तसेच ग्रीन एनर्जीचा वापर वाढविणे आदी बाबींवर भर देण्यात यावा. यासह या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्यासाठी जनजागृती करता येईल. त्याचप्रमाणे विविध समस्या सोडविण्यासाठी देखील या समितीचा उपयोग होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.