समीर वानखेडेंवर टीका करत असल्यामुळे धमकीचा फोन; नवाब मलिकांचा दावा


मुंबई – कॉर्डेलिया क्रूजवर २ ऑक्टोबरला मुंबईत एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांना नवाब मलिक यांनी सातत्याने लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांनी ही सर्व कारवाई बनाव असून समीर वानखेडेंनी सेलिब्रिटींकडून दुबई-मालदीवमध्ये जाऊन वसुली केल्याचा आरोप देखील केला आहे. तर दुसऱ्या बाजूने समीर वानखेडेंनी देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधून धमकी देणारा फोन आपल्याला आल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून याबाबत नवाब मलिक यांनी तक्रार दाखल केल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

यासंदर्भातील माहिती देताना नवाब मलिक यांनी हा कॉल राजस्थानमधून आल्याचे सांगितले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका आणि आरोप न करण्याविषयी कॉलमध्ये आपल्याला सांगण्यात आल्याचा देखील दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीने आर्यन खान प्रकरणात केलेल्या कारवाईवर नवाब मलिक सातत्याने आक्षेप घेत आहेत. कोरोना काळात सर्व सेलिब्रिटी मालदीवमध्ये होते. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबिय नेमक्या त्याच काळात मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते? असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. काही लोकांना चुकीच्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांच्याकडून वसूली करण्याचा प्रयत्न मालदीव आणि दुबईत झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या कुटुंबीयांवर नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समीर वानखेडेंनी स्पष्ट केले आहे. नवाब मलिक चुकीच्या गोष्टी सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटे आहे. मी माझ्या कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्टी घालवण्यासाठी गेलो होतो. यासाठी मी विभागाची रीतसर परवानगी देखील घेतली होती. तिथे मी कुणालाही भेटलो नाही. अशा प्रकारच्या आरोपांना मला अजून काहीही उत्तर द्यायचे नाही. मी डिसेंबरमध्ये मुंबईत होतो. पण त्यांचा आरोप आहे की मी दुबईला होतो. याची चौकशी देखील ते करू शकतात, असे समीर वानखेडे म्हणाले आहेत.