जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचारावरून किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा डागली टीकेची तोफ


मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीकेची तोफ डागली आहे. आज महाराष्ट्राच्या १२.५० कोटी जनतेची दिशाभूल करण्याचा अजित पवारांनी चांगला प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले, त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर अजित पवार यांनी दिले नाही. अजित पवार यांच्यात ते करण्याची हिंमतच नाही, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, आज महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा अजित पवार यांनी चांगला प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. अजित पवार यांच्यात ते करण्याची हिंमतच नाही. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला. आता पण तेच चालवत आहेत. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, पण त्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

१० दिवस आयकर विभागाच्या धाडी चालल्या आहेत. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारांच्या बहिणी, अजित पवारांचे बिझनेस पार्टनर, १,००० कोटींची बेनामी संपत्ती, त्यांच्याकडून १०० कोटीहून अधिकच गुंतवणूक अजित पवार यांच्या कंपनीत करण्यात आली. यावर अजित पवार एकही उत्तर देऊ शकले नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर विकत घेणाऱ्या गुरू कमोडिटी कंपनीला अर्धे पैसे म्हणजे ३२ कोटी रुपये अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल आणि ग्रुप कंपनीने दिले. हा कारखाना गेली १० वर्ष जरंडेश्वर शुगर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवीत आहे. त्याचे मालक अजित पवार, त्यांच्या २ बहिणी आणि सुनेत्रा अजित पवार आहेत. साखर कारखाने विकले गेले असतील. त्याच्याविषयी कुणाचीही हरकत नाही. परंतू बेनामी भ्रष्ट पद्धतीने घोटाळा केला याचा तर तपास होणारच, असा इशारा सोमय्या यांनी अजित पवार यांना दिला आहे.