जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उत्तर


पुणे – जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. अनेकदा उत्तर देणे मी टाळले. आज मी वस्तुस्थिती समोर यावी म्हणून बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. खोटी आकडेवारी साखर कारखान्यासंदर्भात देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा आरोप खोटा असल्याचेही अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी यावेळी राज्यातील विकल्या गेलेल्या कारखान्यांची भलीमोठी यादीच वाचून दाखवली. कारखाने विक्रीच्या व्यवहाराचे रकमांसह त्यांनी वाचन करुन दाखवले. एकूण 30 कारखाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकल्याची यादी अजित पवारांनी वाचून दाखवली.

याबाबत अजित पवारांनी सांगितले की, राज्यातील वेगवेगळे 30 सहकारी साखर कारखाने राज्य शिखर बँकेने विकले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने सहा सहकारी साखर कारखाने विकले. राज्य सरकारच्या परवानगीने सहा सहकारी साखर कारखाने विकण्यात आले. तीन सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले. बारा सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्रातील 64 सहकारी साखर कारखाने विकत घेतले गेले आहेत किंवा एकाने विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिले आहेत किंवा भाडेकरारावर चालवले जात असल्याचे अजित पवार म्हणाले.

सतत माझ्या कुटुंबांचा जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत सतत उल्लेख केला जातो. लोकांना मला एवढेच सांगायचे आहे की जिल्हा बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर साखर कारखान्याने थकलेले पैसै न भरल्यामुळे कारखान्याचा ताबा घेतला. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीमधे कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने म्हटल्याचे अजित पवारांनी सांगितले. अजित पवार म्हणाले की, नियम हे सर्वांना सारखेच आहेत. सगळी कागदपत्रे घेऊन आज आलो आहे, असे ते सुरुवातीला म्हणाले. ड्रग्ज प्रकरणात कुणाचाही मुलगा असेल, तर त्यावर कारवाई करा, असेही ते म्हणाले.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असे अजित पवार यांनी म्हटले होते. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जात आहे. मी बेईमान आहे की नाही ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता.