ऐतिहासिक.! देशातील लसीकरण मोहिमेने ओलांडला 100 कोटींचा टप्पा


नवी दिल्ली : देशात जेव्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली, तेव्हा कोरोना प्रतिबंधक लसीचा मोठा तुटवडा होता. संपूर्ण देशाचे लसीकरण करायला त्यावेळी अनेक वर्षे जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कोरोना प्रतिबंधक लस देशातील सामान्य नागरिकांना मिळेल कि नाही अशी शंका देखील व्यक्त करण्यात येत होती. पण या सर्वावर मात करत देशातील कोरोना लसीकरण मोहिमेने 100 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक क्षणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही गोष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे साध्य झाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

16 जानेवारी 2021 रोजी देशातील कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटींचा टप्पा ओलांडला. भारत आता लसीकरणाच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येने कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाल्यामुळे येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.

केंद्र सरकारने 100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. देशातील 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतील सीएसएमटीला रोषणाई करण्यात आली आहे.

गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचे यश साजरे करण्यासाठी लाँच केले जात आहे. आता हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी अर्थात रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे. या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही लसीबाबत निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.