भाजपची मुख्यमंत्र्यांवर अवैध बांधकामावर कारवाईच्या निर्देशानंतर टीका


मुंबई- सारी मुंबई अवैध बांधकामांनी गिळंकृत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता त्यावर कठोर कारवाईचे दिलेले आदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर गेली 30 वर्ष मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची अव्याहतपणे सत्ता असताना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा हे सांगण्याची पाळी उद्धव ठाकरेंवर येते, याबद्दल ते आत्मचिंतन करणार का? अन्यथा मुख्यमंत्र्यांचे आदेश म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असल्याचाच त्याचा अर्थ निघेल, असा टोला देखील त्यांनी लगावला.


अवैध बांधकामे, अवैध झोपड्या, राडारोडा टाकून बुझवलेली तिवरांची जंगले अशा प्रकारे साऱ्या मुंबईचे विद्रूपीकरण झाल्यावर आता त्यासाठी जागाच उरली नाही. मुंबईत सरकारी भूखंडांवर, डोंगरांवर, खाजण जमिनीत, पदपाथवर, जलवाहिन्यांवर अशी इंचन इंच जागा झोपडीमाफियांनी बळकावली. पाच मजली टोलेजंग झोपड्या उभारल्या. याला जबाबदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे महापालिकेतील अधिकार्‍यांसोबत असलेले साटेलोटे हेच असून वेळोवेळी शिवसेना नेतृत्वाने या अवैध बांधकामाला दिलेले संरक्षण आहे.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला, गरब्याला परवानगी न देता ईदच्या मिरवणुकीला परवानगी देणारे मुख्यमंत्री या अवैध बांधकाम तोडकाम करण्याची सुरुवात बांद्र्याच्या बेहरामपाड्यापासून करणार का? असा खडा सवालही आमदार भातखळकर यांनी केला आहे. अवैध बांधकामाच्या विरोधातील मुख्यमंत्र्यांचे आदेश म्हणजे ही केवळ स्टंटबाजी असल्याचा टोमणाही त्यांनी मारला आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची आणि अवैध बांधकामाच्या बाबतीत शिवसेना-महानगरपालिका अधिकारी यांचे असलेले साटेलोटे याची जाहीर खुली चौकशी करण्याची आवश्यकता असून हे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का ? असा प्रश्न देखील आमदार भातखळकर यांनी विचारला आहे.