सुब्रमण्यम स्वामींचे बांगलादेश प्रकरणावरून मोदी सरकारवर टीकास्त्र!


नवी दिल्ली – कायम आपल्या कडवट भूमिकांमुळे भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी हे चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. बांगलादेशमधील परिस्थितीवरून प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपल्याच सरकारला कडवट सवाल केला आहे. आता आपण मालदीवला देखील घाबरणार का? असे देखील सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. बांगलादेशमध्ये दुर्गापूजेदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर त्यावरून बांगलादेशसोबतच भारतातील वातावरण देखील तापले आहे.

आज दुपारी सुब्रमण्यम स्वामींनी केलेल्या ट्विटमधून केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. भाजप सरकार बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा निषेध का करत नाही? आपण बांगलादेशला घाबरतो का? लडाखमधील चीनी अतिक्रमणाच्या भितीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावर देखील माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची तयारी दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का? असे ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे.

भारताने आत्तापर्यंत बांगलादेशमधील हिंसाचारासंदर्भात सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. भारतीय दूतावास या प्रकरणी बांगलादेश प्रशासनाच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र विभागाकडून देण्यात आली आहे. काही धार्मिक कार्यक्रमादरम्यान बांगलादेशमध्ये हल्ला झाल्याचे वृत्त आमच्यापर्यंत आले आहे. यावर बांगलादेश सरकारने तातडीने पावले उचलत कार्यवाही केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षादल देखील तैनात करण्यात आल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.