पंतप्रधान मोदींचा केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि सीबीआयला दिला सल्ला


नवी दिल्ली – जगात कुठलीही जागा देशाची फसवणूक करणाऱ्यांसाठी सुरक्षित असता कामा नये. कोणी कितीही ताकदवान असो, ती व्यक्ती जर राष्ट्रहीत आणि जनहीत यांच्यामध्ये येत असेल, तर त्यावर कारवाई करतांना केंद्रीय यंत्रणांनी मागे रहाता कामा नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदींनी हे परखड मत केंद्रीय मुख्य दक्षता आयोग आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्या संयुक्त परिषदेच्या आभासी कार्यक्रमाद्वारे अधिकाऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने २०१४ आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली. याआधी सरकारमध्ये राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची भ्रष्ट्राचार विरोधात कारवाई करण्याची कमतरता होती. पण गेल्या सहा सात वर्षात विविध पावले उचलत भ्रष्टाचाराचे अनेक मार्ग बंद केले, डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत विविध सुविधा आणल्या आहेत, लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहिला नसल्याचा दावाही पंतप्रधान यांनी यावेळी केला.

कोणाला घाबरावयाचे केंद्रीय यंत्रणेचे काम नसल्याचा सल्लाही मोदी यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. विनाकारण या यंत्रणेबद्दल असलेली लोकांच्या मनातील भिती ही काढून टाकली पाहिजे. आम्ही कठोर कायदे केले आहेत, ते कायदे लागू करणे तुमचे काम आहे. केंद्रीय यंत्रणांचे काम तेव्हा सुरू होते, जेव्हा घोटाळा, भ्रष्टाचार, अनियमितता सुरू होते. पण यापेक्षा प्रतिबंधात्मक दक्षतेवर काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे यामुळे केंद्रीय यंत्रणांना काम करणे सोपे होईल आणि देशातील यंत्रणेचा वेळ वाचेल, असेही मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.