अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपनेही केले स्वागत


अमृतसर – अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर मोठा निर्णय घेतला असून विशेष म्हणजे या निर्णयाचे भाजपनेही स्वागत केले आहे. मंगळवारी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा अमरिंदर सिंग यांनी केली आहे. भाजपशी युती शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढला तर करणार असल्याचेही अमरिंदर यांनी जाहीर केले. काही महिन्यांतच पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

यासंदर्भातील माहिती अमरिंदर सिंग यांच्या प्रसारमाध्यम सल्लागारांनी काही ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दिल्लीत मागील काही दिवसांपासून असणाऱ्या या सल्लागारांनी अमरिंदर सिंग यांच्यावतीने केलेल्या ट्विटमध्ये आधी, पंजाबच्या भविष्यासाठीची लढाई सुरु झाली आहे. आपल्या अस्तित्वासाठी पंजाब आणि येथील लोकांच्या तसेच मागील वर्षभरापासून लढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच नवीन पक्षाची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने शेतकरी आंदोलनचा निकाल लागला, तर पंजाबच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपसोबत जागावाटप निश्चित करुन एकत्र निवडणूक लढवू. तसेच आमच्यासारखी विचारसणी असणाऱ्या पक्षांसोबत युतीचाही विचार आहे. खास करुन दिंडसा आणि ब्रम्हपूरमधील अकाली गटांसोबत युतीचा विचार असल्याचेही अमरिंदर सिंग यांच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विट्समध्ये म्हटले आहे.

अमरिंदर सिंग यांच्या या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे. भाजपने अमरिंदर सिंग यांना पंजाबमधील सर्वात मोठे नेते असल्याचे म्हटले आहे. तर सुखदेव सिंग दिंडसा यांनी अद्याप अमरिंदर सिंग यांनी आमच्याशी काहीही चर्चा केली नसल्याचे म्हटले आहे. सुखदेव हे शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) अध्यक्ष आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार परणित कौर यांनी पक्ष सोडू नये, म्हणून काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे समजते.

सध्या राजकीय स्थैर्य आणि अंतर्गत तसेच बाहेरुन असणाऱ्या धोक्यापासून पंजाबला संरक्षण हवे असल्यामुळे आपण पक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे अमरिंदर सिंग सांगतात. मी लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी मी प्रयत्न करेन, सध्या या दोन्ही गोष्टी येथे नसल्याचेही म्हटले आहे.