‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराकडून कंठस्नान


राजौरी – पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्थान घातले आहे. भारतीय लष्कराने ही कारवाई राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे.

भारतीय लष्कराचे नऊ जवान राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. त्यांनी यावेळी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील, तेव्हा उत्तर द्यावे असा सल्ला स्थानिक कमांडर्सला देण्यात आल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

जंगलामधून हे दहशतवादी दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्यामुळे भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले. दोन दोनच्या गटाने हल्ला केल्यामुळे त्यांना भारतीय लष्कराचे लक्ष्य विचलित करण्याची आणि नंतर वेगाने हालचाल करण्याची संधी मिळते, असे एका भारतीय कमांडरने सांगितले. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या ९ ते १० दहशतवाद्यांनी मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केल्याची माहिती दिल्लीमधील साऊथ ब्लॉकने दिली. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर जोर आला आहे. विशेष म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होईल आणि अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर भारतामधील दहशतवादी घुसखोरी वाढण्याची शक्यात आधीपासूनच असल्यामुळे या भागांमध्ये भारताने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली आहे.

सध्या भारतीय लष्कर स्वत:हून हल्ला करण्याऐवजी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला घेराव घालून समोरुन एखादी हालचाल होण्याची वाट पाहतात. जंगलामध्ये युद्ध करताना धीर धरणे आणि विचारपूर्वक पद्धतीने हल्ला करणे फार महत्वाचे असते. असे केले तर कमी प्रमाणात जिवितहानी होते आणि दहशतवाद्यांचा खात्मा करणे अधिक सोयिस्कर होते, असे एका कमांडरने सांगितले.