मागील तीन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये पावसाचे थैमान; आतापर्यंत 16 लोकांनी गमावला जीव


डेहरादून : मागील तीन दिवसांपासून उत्तराखंडात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. उत्तराखंडचे जनजीवन या पावसामुळे विस्कळीत झाले असून उत्तराखंडला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. राज्यात आतापर्यंत या पावसामुळे 16 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या मुसळधार पावसामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे सोमवारी पाच लोकांचा मृत्यू झाला. आज 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील संकटावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे लक्ष ठेऊन आहेत. तर त्यांनी या आधीच उत्तराखंडमध्ये लष्कराची मदत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता अनेक ठिकाणी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक प्रदेशांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी लोक फसले आहेत. प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य हाती घेण्यात आले असून या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य सुरु आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

तर दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे. केरळातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तसेच आज पटनमथीटाच्या खालच्या भागांत पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या भागांत एनडीआरएफची विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच या भागांतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.