महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा राजीनामा


मुंबई: गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील पॅनल चर्चेच्या माध्यमांतून भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अतुल लोंढे यांची राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी विविध समित्यांची फेररचना केली आहे. हे करताना अनेक पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. सचिन सावंत यांचा माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पण, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार आहे. सावंत नव्या बदलामुळे नाराज झाले आहेत. परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिले आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र काँग्रेसचा सचिन सावंत हे मीडियातील चेहरा बनले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ते सातत्याने काँग्रेसची व महाविकास आघाडीची बाजू ठामपणे मांडत होते. काँग्रेसवरील टीकेचा प्रतिवाद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासही ते कचरत नव्हते. त्यांचे नाव विधान परिषदेच्या आमदारकीसाठीही चर्चेत होते. पण, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सावंत यांचे महत्त्व हळूहळू कमी झाले होते. अशातच त्यांच्याकडील मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.