निसर्ग व शेतीशी नातं सांगणारी कोजागिरी पौर्णिमा धन-धान्य, सुख-शांती, आरोग्य समृद्धी घेऊन येवो – अजित पवार


मुंबई :- निसर्ग आणि कृषी संस्कृतीशी नातं सांगणारी कोजागिरी पौर्णिमा राज्यातील प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेचे आध्यात्मिक, कृषीसमृद्धीच्या दृष्टीने असाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा, नाविन्याचं स्वागत करण्याचा हा सण आहे. शेतकरी बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हा सण कोकणात भात, नाचणी, वरीसारख्या धान्याचे पूजन करुन नवान्न पौर्णिमा म्हणून साजरा होतो. कोजागिरी पोर्णिमा साजरी करण्याच्या प्रथा-पद्धती हे आपलं सांस्कृतिक वैभव असून ते टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करुया. राज्यावरचं कोरोनाचं संकट कमी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करुन, यंदाची ‘कोजागिरी’ही सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे पालन करुन, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन आनंदात साजरी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.