मुंब्र्यामधील २०-३० हजार मतदारांची नावे यादीतून गायब प्रकरणी जिल्हाधिकारी जबाबदार; जितेंद्र आव्हाडांचा आरोप


ठाणे – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यामधील २०-३० हजार मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ठाणे महानगर पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. पण, मतदार यादीतून मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या पार्श्वभूमीववर हा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगर पालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे २० ते ३० हजार मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरण असा शेरा मारण्यात आलेला असला, तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत.

दरम्यान यावरुन असे लक्षात आले आहे की मुंब्र्याच्याच मतदार यादीमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये महापालिकेच्या काळामध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आला आहे. जवळपास २० ते ३० हजार मतदारांची नावे मुंब्र्यामध्ये वगळण्यात आली आहेत. यासंदर्भातील कर्मचारी तिथे जातच नाहीत. ही नावे गहाळ झाली आहेत, त्याला जबाबदार कोण? याला जबाबदार जिल्हाधिकारी आहेत कारण त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारीच ही नावे वगळण्यामागे असल्याचे आव्हाड यांनी म्हटल्यामुळे मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहे, ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दरम्यान, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.