भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, त्यामुळे नुकसान होऊ शकते; रामदास आठवले


पुणे – राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला इशारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या नादी भाजपने लागू नये, असे म्हणत मनसेमुळे भाजपला नुकसान होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी यावेळी आरपीआयला पुण्यात महापौर पद आणि मुंबईत उपमहापौर पद मिळावे, अशी मागणी देखील केली आहे.

रामदास आठवले पुढे म्हणाले, आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. भाजपचे मनसेमुळे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही, असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे.

आमचा पक्ष राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपसोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात 15 ते 20, तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी आठवले यांनी केली. रामदास आठवले पुढे म्हणाले, आम्हाला सरकार अस्थिर करण्याची गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या, तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाही. सरकार अस्थिर करायचे असते, तर एक वर्षांपूर्वी केले असते. पवार साहेबाचा आदर असून त्यांच्या मताशी मी सहमत नाही. केंद्र सरकार धाडी टाकायला लावत नाही.

तसेच रामदास आठवले म्हणाले, जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा डाव आहे. अनेकजण उद्योग-व्यवसाय करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये येत असतात. त्यांना दहशतवादी मारत आहेत. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला लागेल. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत. त्यांना विकास करायचा असेल, तर दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आरपारची लढाई करायला लागेल. पाकिस्तानचे फार लाड करून चालणार नाही.

त्याचबरोबर भारत पाकिस्तान सामना होऊ नये, असे माझे मत आहे. भारताने पाकिस्तान बरोबर खेळू नये. पाकिस्तान अनेक हल्ले करत आहेत. जय शहा यांना मी भारताने पाकिस्तानशी खेळू नये असे सांगेन. खेळामध्ये राजकारण आणू नये, हे खरे असले तरी, अशा परिस्थितीत पाकिस्तानशी खेळू नये, असं रामदास आठवले यांनी सांगितले.