राज्य सरकारची सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत, तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी


मुंबई : बऱ्याच अंशी यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करता येणार आहे. कारण राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण होत असल्यामुळे कोरोना निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार आता राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नुकतीच यासंदर्भातील कार्यपद्धती व नियम जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची काल सोमवारी कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक झाली. हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याचा निर्णय यावेळी झाला, राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहांसोबत अम्यूझमेंट पार्कही 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण होत असल्यामुळे राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात काल टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातील राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल. या वेळी लहान मुलांच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. 22 ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क देखील सुरू होणार आहेत. तसेच कोरोना व्यतिरिक्त डेंग्यू, चिकूनगुन्या यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, हळूहळू निर्बंध आपण शिथिल करीत असून बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. आपण 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत असल्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान केंद्राच्या मुलांच्या लसीकरणासंदर्भात संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे, तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या आहेत. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला, तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे, खूप आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी आणि संबंधितांच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.