बाळासाहेब ठाकरे नसते तर मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते ; भास्कर जाधवांची भाजपवर टीका


सावर्डे – शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोकणातील शिवसेना नेत्याने टीकास्त्र डागले आहे. कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचे अस्तित्व केव्हाच संपले असते, अशी टीका कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलताना केली आहे.

उद्धव ठाकरेंनी काल एक भाषण केले आणि भाजपच्या लोकांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. त्यांनतर भाजपचे सर्व नेते तुटून पडले आहेत. फक्त मराठी माणसेच भ्रष्टाचारी आहेत का? भाजपचे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. कारवाई फक्त मराठी माणसांवरच करता. यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का? जरा विरोधात बोलले की चौकशी लावतात. मराठी माणसाला संपवण्याचे काम सुरु आहे. हे केवळ मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याकरता सुरु आहे. ७० वर्षे काँग्रेसने राज्य केले, पण त्यांनी कधी शिवसेना भवनाबद्दल कधी वाईट शब्द काढला नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

शिवसेनेचे बोट धरून आज हे भाजपवाले महाराष्ट्रात मोठे झाले. देशामध्ये भाजप शिवसेना प्रमुखांमुळे मोठी झाली आहे. सोशल मिडीयावर आमच्या नरेंद्र मोदींचा फोटो लावून शिवसेनेवाले निवडणून आले म्हणून सांगतात. कोण नरेंद्र मोदी? जेव्हा १९८४ साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली, तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झाले आहात, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीनंतर मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही, असे म्हटले. नरेंद्र मोदी बाळासाहेबांमुळेच देशाचे पंतप्रधान आहेत, नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवला, असे भास्कर जाधव म्हणाले.

उद्ध ठाकरेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केले, तर ते म्हणतात आमच्या पाठीत खंजीर खुपसला. काल म्हणाले बेईमानी सरकार. एक महिना सरकार होत नव्हते. चर्चा सुरु होती. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादी सोबत गेली की भाजप? ८० तासांचे सरकार कोणी बनवले? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केंद्रातील मंत्र्यांची बैठक घेतली होती. रातोरात सरकार बनवून तुम्ही शिवसेनेला फसवे. तुम्ही खणलेल्या खड्ड्यामध्ये तुम्हालाच पडावे लागले, ही बाळासाहेबांची पुण्याई असल्याचे असे भास्कर जाधव म्हणाले.