कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता नाही, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती


नवी दिल्ली- देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसतानाच देशात तिसऱ्या लाटेबाबतच्या शक्यता आणि धोक्याची चर्चा होऊ लागली होती. अनेक शंका देखील तिसऱ्या लाटेबाबत उपस्थित करण्यात आल्या. तिसऱ्या लाटेसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना निर्णायक महिना ठरेल, असे सांगितले गेले होते. पण आता तिसऱ्या लाटे संदर्भातील एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोना प्रादुर्भावाच्या आणखी एका लाटेची कोणतीही शक्यता सध्या दिसून येत नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील अंतराचा अभ्यास करता तिसरी लाट ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात येऊ शकते, अशी शक्यता काही वायरोलॉजिस्ट आणि डॉक्टरांनी वर्तवली होती.

तज्ज्ञांच्या मतानुसार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत जीनोम सिक्वेंसिंग आणि इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार व्हायरसच्या म्युटेशनचे कोणतेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. त्याचबरोबर कोरोनाचा नवा व्हेरिअंटही समोर आलेला नाही. दरम्यान, फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोरोना नियमांचे पूर्णपणे पालन करण्याचे आवाहन सरकार आणि तज्ज्ञांनी केले आहे. कारण तोपर्यंत कोरोना विरोधी लसीकरणात देशाला मोठे यश आलेले असेल आणि परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक पद्धतीने पाहायला मिळेल.

SARS-CoV-2 चे जीनोम सिक्वेंसिंगचे नोडल अधिकारी डॉ. व्ही. रवी यांच्या मतानुसार कोरोनाचे संक्रमण डेल्टा व्हेरिअंटपर्यंत मर्यादित राहिले आहे आणि ते आता कमी होताना दिसत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान देशातील लसीकरणाचे प्रमाण वाढले असून कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्यामुळे व्हायरसच्या म्युटेशनचीही शक्यता आता कमी आहे.

डॉ. व्ही रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत मर्यादित असलेले Mu आणि C.1.2 सारखे नवे व्हेरिअंट येण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यातही नवा व्हेरिअंट आलाच, तर तो डेल्टा किंवा डेल्टा प्लस एवढा घातक नसेल. डेल्टा प्लस हाच दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत व्हेरिअंट होता.

दरम्यान, आपल्याला अजूनही खूप सतर्क राहण्याची गरज असल्याचे आरोग्य आयुक्त रणदीप डी यांनी म्हटले आहे. जोपर्यंत १०० टक्के लसीकरण होत नाही. तोपर्यंत कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सध्या कर्नाटकमध्ये ८० टक्के जनतेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय सरासरी आकडेवारीपेक्षाही हा आकडा चांगला आणि वाखणण्याजोगा असल्याचेही ते म्हणाले. याच दरम्यान ऑगस्टमध्ये एका सीरो सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीत बंगळुरुमध्ये ८० टक्के आणि संपूर्ण कर्नाटकमध्ये ६५ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाल्या असल्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका खूप कमी झाला आहे.