राज्य सरकारचा राज्यातील कोरोना निर्बंधांबाबत मोठा निर्णय!


मुंबई – राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस घसरण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. दुसरीकडे तिसऱ्या लाटेची टांगती तलवार देखील असल्यामुळे नेमके कोणते निर्बंध शिथिल करावेत आणि कोणत्या बाबींवर कठोर निर्णय घ्यावेत, यावर राज्य सरकारला मोठी कसरत करावी लागत आहे. यातच, आता राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील टास्क फोर्सची आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबच सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील उपहारगृहे, दुकाने आणि अम्युझमेंट पार्कविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

आज टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील उपहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपहारगृहांची वेळ देखील वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ही वेळ वाढवली जाणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वेळ वाढवण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. दरम्यान, अम्युजमेंट पार्कबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत इतर राईड्ससाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, पाण्यातील राईड्सबाबत नंतर निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले आहे. २२ ऑक्टोबर पासून अम्युझमेंट पार्क देखील सुरू होत आहेत.