टीम इंडियामध्ये पाच पदांसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज


नवी दिल्ली – टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह पाच पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी क्रीडा प्रमुख या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज आमंत्रित केले आहेत. २६ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उर्वरित पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर आहे.

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपले पद सोडतील. शास्त्रींच्या जाण्यानंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड ही जबाबदारी स्वीकारेल, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. द्रविडचा करार प्रथम २०२३ पर्यंत असेल. अहवालानुसार, द्रविडने टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला भेटून त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती आणि त्याने ते मान्य केले आहे.