परीक्षा गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप; आघाडी सरकारला घरचा आहेर


मुंबई – विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे चिंतेचे वातावरण आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील संताप व्यक्त केला असून आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले असून परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळत आहेत, हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसंच येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससीमार्फतच घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे.


एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.


तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा, अशी मागणीही मांडली आहे.


उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती, असल्याचे ते म्हणाले आहेत.