केरळमध्ये पावसाचे थैमान; 18 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता


त्रिवेंद्रम : केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून संपूर्ण राज्यात पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. अनेक नागरिक भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. केरळच्या पाच जिल्ह्यांत दोन दिवस रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता लष्कराला पाचारण करण्याची विनंती केली, असून अनेक भागांत लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

रेड आणि ऑरेंज अलर्ट केरळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता केरळ किनारपट्टीवर पोहोचल्यामुळे केरळात पावसाचा जोर वाढला आहे. दक्षिण आणि मध्य केरळमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्रिवेंद्रम, कोल्लम, पदानमटिट्टा, कोट्टायम, इडुक्की जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोट्टायम जिल्ह्यातच आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला असून 13 जण अद्याप बेपत्ता आहेत.

पुरामुळे केरळात अत्यंत भयावह परिस्थिती झाली आहे. संपूर्ण राज्यात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अनेक भागांत मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. लष्कराची एक तुकडी कोट्टायममध्ये तैनात आहे. तर दुसरी तुकडी त्रिवेंद्रममध्ये तैनात आहे. एनडीआरएफची 7 पथकांनीही मदत आणि बचाव कार्य सुरु केले आहे. एअर फोर्सलाही मदत कार्यासाठी तयार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर आजपासून 21 ऑक्टोबरपर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. अयप्पा देवाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भक्त मंदिरात येऊ शकतात. त्यात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

पूरस्थिती कोट्टयम, इडुकी आणि पथनमथिट्टा जिल्ह्यांतील डोंगर परिसरांत निर्माण झाली आहे. यापूर्वी अशीच काहीशी परिस्थिती 2018 आणि 2019 मध्येही निर्माण झाली होती. केरळात 2018 मध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. त्यावेळी जवळपास 450 हून अधिक लोकांनी जीव गमावला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजयन यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी स्पष्ट निर्देश दिले. तसेच राज्यातील सर्व पर्यटन स्थळे पुढील सुचनेपर्यंत बंद ठेवण्यासाठी सांगण्यात आले आहे.