कांचन गिरी यांची उद्धव ठाकरेंवर टीका तर राज ठाकरेंचे कौतुक


मुंबई – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कांचन गिरी यांनी सडकून टीका केली आहे. आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचे नाव उद्धव ठाकरे यांनी बुडवले असल्याचे मत कांचन गिरी यांनी व्यक्त केले. पण, यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कौतुक केले. कांचन गिरी यांनी हिंदुराष्ट्राच्या बांधणीसाठी राज ठाकरेंची भेट घेत असल्याचे सांगितले. कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी त्या बोलत होत्या.

कांचन गिरी म्हणाल्या, मला उद्धव ठाकरे यांच्याबाबत काहीही बोलायचे नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बुडवले आहे. जे बाळासाहेब ठाकरे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे. मुस्लिमांसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी पक्ष बनवला. त्यासाठी मी नाराज आहे. जे हत्याकांड पालघरमध्ये झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केल्याचा आरोप कांचन गिरी यांनी केला.

राज ठाकरेंचे कौतुक करताना कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प राज ठाकरे पूर्ण करतील. राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत जो पूर्वग्रह झाला आहे, तो मी दूर करेल. ते समजुतदार असल्यामुळे ते समजून घेतील, असेही कांचन गिरी यांनी नमूद केले.