देशभरात खळबळ; सिंधू बॉर्डरवर आढळला हात तोडून बॅरिकेटला बांधलेला मृतदेह


नवी दिल्ली – एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह दिल्लीच्या बाहेर सिंधू सीमेवर पोलीस बॅरिकेटला बांधलेला आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या करणाऱ्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला होता. धारदार शस्त्रांचे वार या व्यक्तीच्या शरीरावर ठिकठिकाणी झालेले दिसत आहेत. कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळावर येऊन मृतदेह खाली घेतला. तसेच हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक हंसराज म्हणाले, शेतकरी आंदोलन सोनिपतमधील कुंडलीत सुरू आहे, तेथे आज पहाटे ५ वाजता बॅरिकेटला हात बांधून बांधलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. तेव्हा हात-पाय तोडलेला एक मृतदेह बॅरिकेट्सला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेला कोण जबाबदार आहे, याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपअधिक्षकांनी दिली.

दरम्यान, या हत्येमागे निहंगा असल्याचा आरोप ४० शेतकरी संघटना एकत्र येऊन तयार झालेल्या संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाला यांनी सांगितले, या हत्येमागे निहंगा आहेत. त्यांनी हे मान्य केले आहे. आम्हाला निहंगा सुरुवातीपासून अडचणीत आणत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने या घटनेशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच या हत्येतील गुन्हेगारांविरोधात कारवाईसाठी हरियाणा सरकारला सहकार्य करण्यास आपली तयारी दाखवली आहे.