एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून मते मिळतील याची काही शाश्वती नाही; केंद्रीय नेत्याचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – हरियाणामध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप तिसऱ्यांदा प्रयत्न करत असताना एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून राहून ते होऊ शकत नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत केले आहे. सध्या बैठकीमधील एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये नियोजन आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री राव इंद्रजित सिंह एकट्या मोदींच्या नावे मते मिळतील याची काही शाश्वती नसल्याचे म्हणत आहेत.

आपल्यावर आणि राज्यावर नरेंद्र मोदींचा आशीर्वाद आहे. पण त्यांच्या एकटयाच्या नावे मते मिळतील याची काही शाश्वती नाही. मोदींच्या नावे मतदार मते देतील, असा आपला हेतू असू शकतो, पण हे सर्व तळागळात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. मत मतदान देतील हे त्यांच्यावरच अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी यावेळी भाजपच्या २०१४ मधील मोठ्या विजयाचा उल्लेख करताना म्हटले की, मोदींमुळेच भाजप केंद्रात सत्ता स्थापन करु शकली हे, आम्हाला मान्य आहे. त्याचा राज्यांमध्येही फरक पडला. हरियाणातही पहिल्यांदा भाजपने आपले सरकार स्थापन केले. भाजपला दुसऱ्यांदाही यश मिळाले. पण अशावेळी शक्यतो दुसऱ्या पक्षाला संधी मिळते.

भाजपला पहिल्यावेळी ९० पैकी ४७ जागा मिळाल्या, तर दुसऱ्यावेळी ४० जागा मिळाल्या असे सांगताना विजयी आकडेवारी कमी होत असते, असे त्यांनी सांगितले. पण या ४५ जागा आपण राखू शकतो का? याचा विचार करणे गरजेचे असल्याचे राव इंद्रजित सिंह यांनी कार्यकर्ते आणि बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांना सांगितले.