राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण – अपर मुख्य सचिवांची माहिती


मुंबई : राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांचे कालपर्यंत कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात काल सायंकाळी पाच वाजता नऊ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा पार करण्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला यश आले. यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही संख्या देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे अपर मुख्य सचिव डॉ. व्यास यांनी सांगितले.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून देशभरात येत्या १५ तारखेपर्यंत शंभर कोटी नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले’ अभियानामध्ये सर्व विभागांच्या अधिकारी- कर्मचारी यांना एकत्रित करुन लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे.