‘एअर इंडिया’नंतर आणखीन एका मोठ्या खरेदीच्या तयारीत टाटा समूह?


नवी दिल्ली – एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीसाठी मागील आठवड्यामध्ये १८ हजार कोटींची किंमत मोजण्याची तयारी दाखवत बोली जिंकणाऱ्या टाटा समुहाने आता आणखीन एका खरेदीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. पण एका परदेशी कंपनीकडून ही खरेदी असणार असून संपूर्ण कंपनी नाही तर केवळ कारखाना खरेदी करण्याचा टाटांचा विचार असल्याचे वृत्त आहे. सध्या टाटा समुहाशी तामिळनाडू सरकार चर्चा करत आहे. टाटा राज्यामधील फोर्ड कंपनीचा कारखाना विकत घेतील का याबद्दल चर्चा सुरु आहे. पुढील वर्षी फोर्ड कंपनीकडून चेन्नईमधील मराइमलाई नगरमध्ये असणारा हा फोर्डचा कारखाना बंद करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरु असल्याचे वृत्त इकनॉमिक टाइम्सने दिले आहे.

टाटा मोटर्स हा कारखाना विकत घेण्याची चर्चा सुरु होण्यामागील मुख्य कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांना भेटले. राज्य आणि टाटा समुहामधील हा चर्चेचा दुसरा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. सरकार आणि टाटा ग्रुप यासंदर्भात मागील दोन आठवड्यांपासून चर्चा करत आहे. २७ सप्टेंबर रोजी टाटा मोटर्सचे मुख्य निर्देशक गिरिश वाघ यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती.

पण या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली यासंदर्भातील माहिती समोर आलेली नसली तरी याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामुळेच याबद्दल काही घोषणा असेल, तर ती अधिकृतपणे मुख्यमंत्री कार्यालयाकडून केली जाईल. टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने ईटीने दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखरन यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सहज भेट घेतली होती. तसेच या संदर्भातील चर्चा हा तर्क असल्याचेही कंपनी प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

वर्षाला दोन लाख गाड्या तयार करण्याची फोर्डच्या या कारखान्यामध्ये क्षमता आहे. तर येथे तीन लाख ४० हजार इंजिन्स तयार केले जातात. येथे ३० वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या इकोस्पोर्ट्स आणि एण्डीव्हर या गाड्यांची निर्मिती केली जाते. अमेरिकन कार निर्मिती कंपनीने एक बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करत हा कारखाना सुरु केला होता. कंपनीचा दुसरा एक कारखाना गुजरातमधील सानंद येथेही आहे.

भारतामध्ये निर्मिती बंद करण्याची घोषणा फोर्डने केल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कंपनीचे देशभरामध्ये १७० डिलर्स आहेत, तर कंपनीचा ४०० शोरुमशी थेट संबंध असून हजारो लोक यासाठी काम करतात. यामध्ये सेल्स, आफ्टर सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. फोर्ड कंपनी ओला आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रासोबत कारखान्यासंदर्भात काही व्यवहार होतो का याची चाचपणी करत होती, पण ती त्यामध्ये पुढे काहीही झाले नाही.