देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला मनसे नेते बाळा नांदगावकर


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत आहेत. या शक्यता जरी दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी नाकारल्या असल्या तरी घडणाऱ्या घटनांमुळे या चर्चांना पुष्टी मिळते की काय, असे चित्र सध्या दिसू लागले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काही वेळापूर्वीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बाळा नांदगावकर यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. दोन नेते एकमेकांना भेटले की काही ना काही राजकीय चर्चा होतेच, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. नांदगावकर यावेळी बोलताना म्हणाले, तुम्ही जो अर्थ लावायचा तो लावा. मी वैयक्तिक कारणासाठी या भेटीला आलो होतो.

समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भातही यावेळी त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, समीर वानखेडे हे शासकीय अधिकारी आहेत. ते त्यांची ड्युटी चोख बजावत असतील, अशी मला खात्री आहे आणि तरीही जर त्यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांना उत्तर द्यायला ते सक्षम आहेत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. मी त्यांना दीर्घकाळापासून ओळखत आहे.

त्यांनी यावेळी मनसेच्या दौऱ्यांबद्दलही भाष्य केले आहे. भांडूपमध्ये होणाऱ्या मेळाव्याविषयी विचारणा केली असता नांदगावकर म्हणाले, सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा मेळावा आम्ही आयोजित केला आहे. यात मुंबईचे सर्व पदाधिकारी असतील. तिथून पुढे आम्ही पुण्याला जाऊ, त्यानंतर पिंपरी चिंचवडलाही जाणार आहोत.