देशात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता


नवी दिल्ली – देशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज्य स्तरावर होत नसल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचे स्पष्ट केले जात असल्यामुळे कोळशाच्या पुरवठ्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि खरच देशात वीजकपात करण्याची वेळ येऊ शकते का? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकाराचा आढावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दोनच दिवसांपूर्वी महावितरणकडून वीज वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आज आढावा घेणार आहेत.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अमित शहा यांनी या बैठकीनंतर देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. पण, याआधीच काही राज्यांनी कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली आहे.

कोळसा टंचाई देशभरात निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील औष्णिक वीजनिर्मिती गेल्या काही दिवसांपासून हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशा अभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद असल्यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.