लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मंत्रिपुत्राला तीन दिवसांची पोलीस कोठडी


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. आशिषला लखीमपूरच्या सीजेएम न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेले विशेष तपास पथक सखोल चौकशी करणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे आशिष मिश्राला एसआयटीने न्यायालयासमोर सादर केले. आशिष मिश्राच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी केली होती. पण तीन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. वकील एसपी यादव यांनी सांगितले की, आशिष मिश्राच्या तीन दिवसांच्या कोठडीसंदर्भात काही अटीही घालून देण्यात आल्या आहेत.

१४ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी अर्ज दिला होता. सुनावणीमध्ये काही वेळासाठी व्यत्ययही आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू असल्याने व्यत्यय आल्याची माहिती आजतकने दिली आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आशिष मिश्राची फक्त १२ तास चौकशी होऊ शकली, ज्यात त्याने उत्तरे दिली नाहीत. म्हणून त्याला १४ दिवसांच्या कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. पण आता न्यायालयाने १४ दिवसांऐवजी तीनच दिवसांची कोठडी सुनावली आहे.

आशिषच्या वकिलांनी सांगितले की, पोलिसांकडे आशिषला विचारण्यासारखे फक्त ४० प्रश्न होते, ते त्यांनी विचारले. १२ तासांच्या चौकशीदरम्यान फक्त एकदा पाणी प्यायला दिले. न थांबता सातत्याने चौकशी सुरू होती, प्रश्न विचारले जात होते, पण उत्तरे दिली जात नव्हती.