महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदबाबत घेतली पत्रकार परिषद


मुंबई – महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद उमटत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत या हिंचाराबद्दल खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज (शनिवार) पत्रकारपरिषद झाली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, हा बंद १०० टक्के यशस्वी होणार असल्याचे बोलून दाखवले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची देखील उपस्थिती होती.

संजय राऊत म्हणाले, केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागे करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, महाराष्ट्रामधून याची सुरूवात व्हावी, यासाठी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. तिन्ही पक्ष या बंदमध्ये सहभागी होतील. स्वत: शरद पवार यांनी देखील काल सांगितले आहे की बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे देशाला दाखवून द्यावे.

मी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होतो. माझी या विषयावर राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा झाली. साधारण तिथे असेही ठरले की महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनी देखील अशाप्रकारच पावले उचलावी, जिथे जिथे आपली सरकारे आहेत, जिथे संघटन मजबुत आहे. त्या सर्वच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा बंद पुकारला जावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला रस्त्यावर जरी उतरता आले नाही, तरी जिथून आहे तिथून पाठींबा द्यावा. त्याचबरोबर या निघृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही. हे दाखवण्याची ही वेळ आहे. म्हणून मी एवढेच सांगेन की, काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेना देखील या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरेल.

तसेच, ताकद लावण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. एकदा बंदचा पुकार केल्यावर आणि मुख्यमंत्री व शरद पवार यांनी देखील त्या बंदबाबत भूमिका जाहीर केल्यावर, लोक स्वयंस्फुर्तीने हा बंद पाळतील. कोणतीही ताकद लावावी लागणार नाही. कारण, लखीमपूर खेरीमध्ये जे घडले त्याची जखम या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर झालेली आहे आणि प्रत्येकजण हळहळतो आहे. त्याने ते डोळ्याने पाहिले आहे, की कायदा कसा चिरडला जातो. गुन्हेगारांना कसे मोकाट सोडले जाते? चार शेतकऱ्यांचे खून करून देखील, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा कसा मोकाट फिरतो. हे देशातील जनतेने पाहिले आहे आणि त्याचा धिक्कार म्हणून ११ ऑक्टोबरचा हा बंद आम्ही पुकारला. हा बंद १०० टक्के यशस्वी होईल, एवढेच मी आपल्याला खात्रीने सांगतो, असेही संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवले.