चिंपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व पक्षीय नेत्यांसमोर रामदास आठवलेंची खास कविता


चिपी – सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजनेअंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थितीत पार पडला. सर्वच मोठ्या नेत्यांनी यावेळी भाषणांमध्ये आपले मत व्यक्त केले. आरपीआयचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी आपल्या खास शैलीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीबद्दल भाष्य केले. आठवलेंनी आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या.

आठवलेंनी आपल्या भाषणाची सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान… कारण चिपीमध्ये आले आहे मुंबईवरुन विमान, असे म्हणत सुरुवात केली. पुढे बोलताना आठवलेंनी आपण अजूनही टूरिझम वाढवले, तर या ठिकाणी अनेक ठिकाणाहून विमाने येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे आज राजकारण बाजूला ठेऊन आम्ही एकत्र आलो आहे, हे सुद्धा आठवलेंनी अधोरेखित केले. सर्व पक्षीय नेते उपस्थित असणाऱ्या मंचावरुन आठवलेंनी सगळ्या ठिकाणी राजकारण आवश्यक नसल्याचेही म्हटले.

हे विमानतळ कोकणाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगतानाच कोकणामधील पर्यटनाबद्दल आठवलेंनी भाष्य केले. गोव्यात जगभरातून लोक येतात, तशी या विमानतळामुळे कोकणातही येतील, असे आठवले म्हणाले. आम्हाला पहिल्यांदाच या विमानातून येण्याची संधी मिळाल्याबद्दल आठवलेंनी आनंद व्यक्त केला.

त्यानंतर मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र बसल्याचे पाहून त्यांच्याकडे पाहत, येथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला आठवले महायुतीचे गाणे, असे म्हणत आठवलेंनी आपल्या खास शैलीत सेना-भाजप युतीचा उल्लेख केला. आठवलेची ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विमानतळासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न केल्याचेही आठवले म्हणाले. आठवलेंनी भाषणाचा शेवटही एका कवितेनेच केला. या ठिकाणी सिंधुदुर्गात येणार आहे विकासाची आंधी… म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.