पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पत्नीवर केलेल्या आरोपांप्रकरणी संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस


मुंबई – भाजप प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध सव्वा रुपयाचा दावा ठोकण्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. पाटील यांनी संजय राऊत यांच्या पत्नीवर पीएमसी बँक घोटाळ्याबाबत आरोप केले होते. या प्रकरणी वकिलांमार्फत संजय राऊत यांनी नोटीस पाठवली आहे.

माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिप्पण्या दिल्याबद्दल मी चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. जर बिनशर्त माफी चंद्रकांतदादांनी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामधील वादानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात अग्रलेख लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. पाटलांनी त्या अग्रलेखाला प्रत्युत्तर देत संजय राऊतांना पत्र पाठवले होते. त्यांनी या पत्रात संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीवर आरोप केले होते.

चंद्रकांत पाटील आपल्या पत्रात म्हणाले होते, तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला? संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो.

पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये तुमच्या पत्नीला मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केला. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल, तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.

आमच्या एका अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी पत्र पाठवले. आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्याच प्रमाणे त्यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचे पत्र सामनात छापले. जेणेकरून पाटलांची विषारी भाषा महाराष्ट्रातील जनतेला कळेल, असे राऊत एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

पाटील जे काही पीएमसी बँक घोटाळ्याबाबत बोलले आहेत, जे आरोप त्यांनी केले आहेत, ते मला मान्य नाही. असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत. असे घोटाळे केले असते, तर मी एवढ्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. जे पाटलांनी म्हटले त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. पण मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही.

मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया असल्याची टीका राऊत यांनी केली. तसेच भाजप नेत्यांच्या तोंडाची गटारे झाली असून ते तोंडात येईल ते बोलतात. देशात न्यायालये नाहीत का, फक्त ईडीचीच कारवाई का होते. भाजपच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केले. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का, असा सवालही राऊतांनी केला.