चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणे अॅक्शन मोडमध्ये; उद्या जाहीर सभेत भांडाफोड करण्याचा दिला इशारा


मुंबई – शिवसेना आणि केंद्रीय नारायण राणे यांच्यातील मतभेद आणि वैर आपल्या सर्वांना माहितच आहेत. त्यात आता केंद्रीय मंत्री झाल्यापासून तर नारायण राणेंचा शिवसेनाविरोध अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होत असताना यावेळी जाहीर सभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा आणि सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सत्ताधारी शिवसेनेवर आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

मी २०१४ साली विमानतळ बांधून पूर्ण केले. फक्त तीनच गोष्टी बाकी होत्या. एक तर पाणीपुरवठा, महामार्गापासून विमानतळापर्यंत येणारा चौपदरी रस्ता आणि वीज या छोट्या गोष्टी होत्या. पण एवढ्या वर्षात त्याही यांनी केल्या गेल्या नाहीत. सिंधुदुर्गातील नेतृत्व खुज्या वृत्तीचे आहे. हे विमानतळ आता सुरू होत आहे. पण आता तेच पुढे राहून म्हणत आहेत आम्ही विमानतळ आणले. जी विकासकामे मी सिंधुदुर्गात आणली, शिवसेनेने त्या सगळ्याला विरोध केला. आता सांगतात आम्हीच केले. तेच भाषणे करायला पुढे असल्याचे राणे म्हणाले.

मीच उद्घाटनासाठी परवानगीही आणली. यांना कुणी विचारतही नव्हते. रोज तारखा जाहीर करत होते. सिंदियांकडे मी गेलो आणि तारीख निश्चित झाली. हे फक्त चकरा मारत होते. मी परवानगी आणली. यांची काय औकात आहे? यांना तिकडे कोण विचारत आहे? कावकाव करून काही मिळत नाही. बुद्धीचा वापर करावा लागतो, अशा शब्दांत नारायण राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली.

दरम्यान, शिवसेनेची सिंधुदुर्गात हफ्तेबाजी सुरू असल्याची टीका राणेंनी यावेळी केली. सिधुदुर्गातील उद्योगपतींना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा फार त्रास आहे. गाडी घेऊन दिल्याशिवाय त्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करू दिले नाही. ही शिवसेनेची हफ्तेबाजी आहे. मी उद्या जाहीर सभेमध्ये सगळ्यांची नावे सांगणार आहे. विकासाच्या आड येणारी ही लोक आहेत, हे मी सांगणार आहे. त्यांचा भांडाफोड उद्या जाहिर सभेत करणार असल्याचे राणे म्हणाले.